top of page
Search

शहाणा प्रयत्न औषधोपचारांचा ...

मानसिक आजाराच्या प्राथमिक लक्षणांकडे हल्ली काहीतरी बिनसलंय, स्वभावच तसा आहे, पहिल्यापासून तो / ती तसाच / तशीच आहे, विक्षिप्त आहे, जरा विचित्र वागतो / वागते अशा समजातून दुर्लक्ष केलं जातं.  या यावर पुन्हा पुन्हा सांगत राहणं, आता सुधारेल-मग सुधारेल म्हणत वेगवगळ्या व्यक्तींकरवी काही गोष्टी त्या माणसाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत राहणं हे उपाय केले जातात. तीव्र लक्षणं दाखवणारा एखादा गंभीर आजार अचानक उद्भवला तर देवाचा कोप झाला, भुताने झपाटलं, बाहेरची बाधा झाली किंवा कोणीतरी वाईटावर आहे, करणी केली असं म्हंटलं जातं. ह्यासाठी एखाद्या मांत्रिकाकडे जाऊन झाड-फूक करणं, करणी उतरवणं, गंडे-दोरे बांधणं, एखाद्या देवाला नवस बोलणं, जप-मंत्र- पूजा-पाठ करणं असे उतारे केले जातात. ह्यामध्ये साधारणपणे ५-७ वर्षं सहज निघून जातात. आजाराच्या मुख्य कारणावर उपचार न झाल्यामुळे आजार बळावतो. लक्षणं कमी तर होत नाहीतच मात्र तीव्र होतात किंवा वाढतात. 


वरच्या सगळ्या सांस्कृतिक बाबी करून झाल्यानंतरही आजार बरा झाला नाही तर आपलं नशीबच फुटकं आहे किंवा आपल्याला कसला तरी शाप आहे ह्या समजुतीत राहून माणसं शास्त्रीय उपचारांपर्यंत जात नाहीत. मानसिक आजारांवर इलाज करणारे डॉक्टर्स सगळीकडे उपलब्ध नसतात, असले तरी लोकांना त्याची माहिती नसते, उपचारांचा खर्च परवडत नाही अशा एक ना अनेक कारणांमुळे पुन्हा पुन्हा अशास्त्रीय उपचार करण्याकडे कल होतो. 


मानसिक आजारांवर केवळ औषधं देऊन आजार बरे होत नाहीत. त्यांच्या जोडीला इतर मानसोपचार तंत्रांची / पद्धतींची आखणी करावी लागते. मेंदूत रसायनांचा झालेला असमतोल दुरूस्त करण्यासाठी औषधं उपयुक्त ठरतात. तर भावना-विचार-वर्तनात झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी वेगवगळ्या शास्त्रीय तंत्रांचा / पद्धतींचा वापर करून कमतर झालेली कौशल्यं पुनर्स्थापित आणि विकसित करण्याचं काम केलं जातं. मानसिक आजारांची प्राथमिक लक्षणं लक्षात येताच मनोविकारतज्ज्ञांचा किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. अस्वास्थ्याच्या पायरीवर असणारे काही आजार वेळेत आणि योग्य उपचार केले तर औषधांशिवायही बरे होऊ शकतात. काही औषधं आणि मानसोपचार यांच्या एकत्रित वापराने बरे होऊ शकता. तर काही गंभीर आजार या दोन्हींच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवता येतात. 



मांत्रिकाच्या प्रयत्नांतून केवळ तात्पुरतं आणि किंचित स्वरूपाचं मानसिक समाधान मिळतं. मात्र औषधोपचारांच्या मार्गाने आजाराने त्रस्त व्यक्ती थोड्याफार फरकाने इतर सर्वसामान्य व्यक्तींसारखं जीवन जगू / अनुभवू शकते. म्हणूनच सूज्ञ - शहाण्या व्यक्तींनी, कुटुंबांनी आणि समाजाने मांत्रिकाच्या गंड्याला (उपचारांना) 'नाही' म्हणावं आणि औषधोपचारांचा जास्त खात्रीशीर मार्ग पत्करावा हे बरं!


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Logo transparent.png

Mental Health is a continuous process of healing oneself from physical, mental - emotional traumas and walk towards ultimate journey of life.  

Get social with us!
  • Youtube
  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
Share your thoughts!

​Contact: ​02363-299629 / 9420880529

Email : info@sahajtrust.org

​​​

© Sahaj Trust, Galel, Sindhudurg

Powered and secured by Wix

bottom of page